काही दिवसांपूर्वी एका संस्थेच्या दशकपूर्ती समारंभाला जाण्याचा योग आला. खाजगीपणा जपण्याकरता
इथे नावाचा उल्लेख करत नाही. संस्थेच्या कार्याची ओळख वृत्तपत्रातील एका लेखामुळे झाली होती.
अभ्यासपूर्ण पदभ्रमण-गिर्यारोहण हे संस्थेचे मुख्य कार्य. परंतू हे करत असताना त्यांनी समाजिक
बांधिलकी ही जपली होती. "नुसताच निसर्गाचा आनंद लुटण्यापेक्षा त्याच निसर्गात रहाणाऱ्या
निसर्गाच्या लेकरांचे जीवन अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न का करू नये?" हा कार्यकर्त्यांचा विचार
मला भावला.
गिर्यारोहणाच्या आवडीमुळे आणि संस्थेच्या उपक्रमांमुळे मी सहाजिकच संस्थेकडे आकृष्ट
झाले. त्यांच्याबरोबर पदभ्रमण करायची संधी कधी मिळेल ह्याची मी आतुरतेने वाट पाहू लागले.
अशातच एके दिवशी एका कार्यकर्त्याचा मला फोन आला. "अमुक दिवशी, अमुक ठिकाणी, इतक्या वाजता संस्थेने 'परिचय मेळावा' योजिला आहे. नक्की येण्याचे करावे," असे निमंत्रण मिळाले. संस्थेच्या
कार्याची अधिक माहिती मिळण्याची, कार्यकर्त्यांशी ओळख होण्याची आणि नवीन माणसं जोडायची ही उत्तम संधी होती. मी माझ्या एका मैत्रिणीसोबत तिथे जाण्याचे निश्चित केले.
ठरल्या दिवशी, दिलेल्या वेळेपेक्षा थोडे उशीराच आम्ही दोघी सांगितलेल्या ठिकाणी पोचलो. योजलेले ठिकाण पाहूनच मी थोडी निराश झाले. "आजकालचे समारंभ उगाच भपकेबाज असतात! त्यामुळे, आपल्या अपेक्षेपेक्षा कमी असणऱ्या गोष्टीला सकृतदर्शनी कमी लेखू नये," असे मी स्वतःला लगेच बजावले. कार्यक्रम सुरु झाला नव्ह्ता हे बघून थोडं हायसं वाटलं.
हॉलमध्ये वीस-एक माणसं जमली होती - स्त्रिया नव्ह्त्याच. ना फार पुढे ना अगदी मागे अशा जागी
जाऊन, मी आणि माझी मैत्रिण बसलो आणि कार्यक्रम सुरु व्हायची वाट पाहू लागलो. आजूबाजूचे निरिक्षण चालूच होते. जमलेली बहुतेक मंडळी पस्तीशीच्या पुढचीच वाटली. प्रमुख पाहुणे म्हणून एका ज्येष्ठ इतिहास संशोधकांना निमंत्रित केले होते. कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुत्रसंचालकाच्या
बोलण्यावरून कळले की हे संस्थेच्या 'दशकपूर्ती वर्ष' होते. कार्यक्रमात सर्वप्रथम संस्थेच्या
कार्याचा आढावा घेण्यात आला. आढाव्यानंतर अनौपचारिक ओळखीचा कार्यक्रम झाला.
हे सगळं चालू असताना मनात कुठेतरी "I DON'T FIT HERE" अशी भावना उसळत होती. अधून-मधून "आपण इथे येण्याचा योग्य निर्णय घेतला का?" असा विचारही मनात डोकावत होता. "EVERYTHING APPEARS YELLOW TO THE JAUNDICED EYE" ह्या इंग्रजी उक्तीप्रमाणे कार्यक्रमात मला दोषच दिसु लागले. प्रमुख पाहुण्यांचे भाषण मला जरा जास्तच नाटयपूर्ण वाटले.
मनातील विचारांमुळे मला कार्यक्रमाचा समरसून आनंद घेता येत नव्ह्ता आणि म्हणून स्वतःचा रागही
येत होता. कार्यक्रम अगदी साधा होता, तिथे आलेली माणसं माझ्या सामाजिक-सांस्कृतिक स्तरातील
नव्हती - हे त्यांच्या एकंदर बोलण्यावरून, पेहेरावावरून स्पष्ट होते. पण म्हणून मी त्यांचा, ह्या कार्यक्रमाचा अव्हेर का करावा? माणसाच्या कार्यापेक्षा मी त्याच्या राहाणीमानाला जास्त महत्त्व का देत होते? स्वतःकडे उदंड नसतानाही, आपल्यापेक्षा दुर्बल समाजाला मदत करता येते; ह्याचे जिवंत उदाहरण म्हणजे ही सर्व मंडळी होती.
तिथे जमलेली माणसं माझ्या सामाजिक-सांस्कृतिक स्तरातील असती तर मला ती अधिक भावली असती का? - कदाचित. ह्या उलट जर ते उच्च्भ्रु वर्गातले असते तर त्यांच्याबद्दल, ह्या कार्यक्रमाबद्दल मला
काय वाटले असते? - "त्यांना काय झालयं हे सगळं न जमायला?" का "उगाच स्तोम माजवत आहेत." असे काहीसे विचार त्यावेळच्या परिस्थितीनुसार आले असते, असे वाटते.
असो. मनातील द्वंद्व चालूच होते. शेवटी काहीतरी निमित्त करून मी आणि माझी मैत्रिण तिथून
सटकलो. मनातील विचारांचा हा तिढा सुटेल तेव्हा सुटो. सध्या संस्थेच्या कार्यकर्त्यांना एवढेच
म्हणीन, "तुमच्या पदभ्रमणाला आणि कार्याला माझ्या मनापासून शुभेच्छा! माझ्या कोत्या मनाला क्षमा
करा."
Labels: आमचे अनुभव, आमचे तत्वज्ञान, स्फूट