Tuesday, September 16, 2008

साखळी हायकू

सुमेधानी सुरु केलेल्या साखळी हायकूत एक कडी गुंफण्याची संधी, चक्रपाणिच्या खोमुळे मिळाली. तशी हायकूबद्दल थोडीफार माहिती होती, पण हायकू लिखाणात उडी घेण्याआधी त्याबद्दल थोडा अभ्यास करावा असं वाटलं. सईच्या ह्या आटोपशीर लेखाचा आधार घेत, शब्दांची जुळवा-जुळव करू लागले. सुमेधानी घातलेले नियम आणि हायकू लिखाणाचे नियम संभाळून, शब्दांना हायकूत बांधताना असं लक्षात आलं की वाचताना वाटला होता तितका सोप्पा प्रकार नाही हा!! (हायकू पहावी करून - घर पहावं बांधून सारखं) पदार्थ मनासारखा होईपर्यंत झटणारी मी, हायकूच्या बाबतीतही तितकीच काटेकोर होते. असो, म्हणायला जमली माझी हायकू...तरीही काहीतरी कमी आहे असं वाटतय. बराच विचार केला पण ह्यापेक्षा अधिक सरस काही जमले नाही, त्यामुळे पहिल्यांदा जुळलेली हायकू इथे मांडत. साखळी पुढे नेण्याकरता खो नंदन आणि शैलेशला.

तारकांच्या गर्दीत
चंद्र एकटा
माझा रात्रीचा सखा..

साखळी हायकूचे नियम खालीलप्रमाणे -

१) वर दिलेल्या हायकू प्रमाणे दोन किंवा तीनच ओळींचा (की ओळींची?) हायकू रचायचा.
२) त्यातील मात्रा, ताल, ध्वनीरुप तसंच्या तसं आलं तर उत्तम, शक्य तितकं साम्य राखायचा प्रयत्न करायचा.
३) सर्वात महत्त्वाचे, ही साखळी असल्यामुळे तुम्ही जी कडी गुंफणार आहात तिची आधीच्या कडीशी काहीतरी जोडणी असावी : त्यातील लपलेल्या किंवा स्पष्ट दिसणार्‍या अर्थानुसार, त्यातील वापरलेल्या प्रतिमेनुसार, सुचित केलेल्या कल्पनेनुसार किंवा व्यक्‍त होणार्‍या भावनेनुसार किंवा अजून काही असेल!
४) कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त ३ जणांना खो द्यायचा. त्यांच्या ब्लॉगवर त्यांना प्रतिक्रिया देऊन तसं कळवायचं आणि शक्य असल्यास
सुमेधाच्या ब्लॉगवर तिला कळवायचं. कळवायचा हेतू इतकाच की ती सगळ्या कड्या एकत्र करू शकीन.
५) तुमच्या नोंदीच्या सुरुवातीला हे नियम डकवा, तुम्ही ज्या कडीच्या पुढे लिहीताय ती कडी उतरवा, आणि शक्यतो तुम्ही ज्यांना खो देताय त्यांच्या ब्लॉगची link द्या.

Thursday, September 11, 2008

आवडलेले थोडे काही

संवेदनी सुरु केलेला खो-खो सुमेधा कडून माझ्यापर्यंत पोचला!

गेल्या कित्येक महिन्यांपासून आळसावलेल्या मला, सुमेधानी खो देऊन, (उसनं घेऊन का होईना) लिहायला भाग पाडलं. सुमेधा मला खो दिल्याबद्दल तुझे आभार. तुझ्या खोला प्रतिसाद द्यायला उशीरच झाला - माफ करशील नं? :)

संवेदचे नियम इथे परत देते:

१. कविता आवडते पण पुर्ण आठवत नाही आणि हाताशी पुस्तकही नाही? हरकत नाही, आठवतं तेव्हढं लिहा. कवीचं नाव मात्र आवश्य लिहा
२. एक से मेरा क्या होगा सिन्ड्रोम? या वेळी तुम्ही तुमच्या सध्या आवडणारया टॉप २ कविता लिहु शकता आणि कवितांच्या प्रमाणात खो देखील देऊ शकता. जेव्हढ्या कविता तेव्हढे खो (जास्तीजास्त अर्थात २)
३. खो खो नीट चालवण्याची जबाबदारी अर्थात सारयांचीच. त्यामुळे तुमच्या पोस्ट मधे तुम्ही ज्या/जिला खो देताय, त्या/तीचं नाव तर लिहाच, शिवाय त्या/तिच्या ब्लॉगवर ही खो दिल्याची नोंद आवश्य करा.
४. कविता का आवडली किंवा कवितेचा अर्थ किंवा काहीच स्पष्टीकरण आपेक्षित नाही.
५. अजून नियम नाहीत :)

जीवन

अनंततेचे गहन सरोवर
त्यात कडेला विश्वकमल हे
फुले सनातन
त्या कमळाच्या
एका दलावर
पडले आहे
थोडे दहिवर
थरथरणार्‍या त्या थेंबाला
पृथ्वीवरचे आम्ही मानव
म्हणतो जीवन

- कुसुमाग्रज


चुकली दिशा तरीही

चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे
वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे

मी चालतो अखंड चालायाचे म्हणून
धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे

डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे
हे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे!

मग्रूर प्राक्तनांचा मी फाडला नकाशा
विझले तिथेच सारे ते मागचे ईशारे

चुकली दिशा तरीही आकाश एक आहे
हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे

आशा तशी निराशा, हे श्रेय सावधांचे
बेसावधास कैसे डसणार हे निखारे?

- विंदा करंदीकर

माझा खो पामर आणि आदित्यला..

Tuesday, September 04, 2007

फिटे अंधाराचे जाळे


प्रत्येक गाण्याचा साज-बाज वेगळा आणि त्यामुळेच प्रत्येक गाणं मनात वेगवेगळे भावतरंग उमटवते. काही गाणी ऐकताक्षणीच आपल्याला वेड लावतात, तर काहींचा रंग ती वारंवार ऐकल्यावरच चढतो. काही गाणी काळाच्या वेढ्यात असतात; एकेकाळी जणू आपण त्याच्या प्रेमात असतो, पण पुन्हा कधी ते कानी पडलं तर प्रश्न पडतो - 'काय पाहिलं ह्याच्यात?'. काही गाण्यांची गोडी मात्र काळा-वेळाच्या पलीकडची असते. काही गाणी आपल्याला त्यांचाच छंद लावतात; एकदा ऐकून समाधानच होत नाही, लागोपाठ पारायणं करायला लावतात.

आनंदी गाणी मनातल्या पाखराला फुलवतात तर विरह गीतं आपल्याला आर्ततेच्या गर्तेत लोटतात. काही गाण्यांमधे आपल्यात नवीन उमेद निर्माण करायची ताकद असते तर काही आपल्याला तल्लीन करून परब्रम्हाचं दर्शन घडवितात....अशी गंमत आहे गाण्यांची.

बऱ्याच वेळा गाणं सुरू असतं, अगदी आपण ठेका ही धरलेला असतो, पण शब्द मनात रुजायच्या आधीच विरून जातात. माझ्या बाबतीत बऱ्याच वेळा होतं असं. पुन्हा एखाद्या निवांत क्षणी तेच गाणं लक्षपूर्वक ऐकलं की मनात विचार येतो - "अरे! इतकं सुंदर गाणं....असं कसं दुर्लक्षित राहिलं आपल्याकडून?" परवा संध्याकाळी अगदी अस्संच झालं. संध्याकाळची वेळ होती आणि मी घरी निघाले होते, गाडीत रेडिओ सुरु होता. 'फिटे अंधाराचे जाळे...' हे गाणं लागलं. तसं माहितीतलं गाणं, नेहेमी कानावर पडणारं. पण त्यादिवशी ते लक्षपूर्वक ऐकल्यागेलं आणि त्यातल्या काव्याच्या प्रेमातच पडले मी.

सूर्योदय - अनादि काळापासून, न चुकता रोज घडणारी निसर्गातली घटना. म्हटलं तर रोजचीच, म्हटलं तर नवलाईची, अपूर्वाईची आणि महत्त्वाची सुद्धा! आपल्या विश्वाचे अस्तित्व सूर्यनारायणाच्या कृपेमुळेच आहे, नाही का?

सूर्योदय म्हणजे प्रकाशाचा अंधारावरचा विजय. कवीने म्हटल्याप्रमाणे सूर्योदय नेहेमीच नवीन आशा, नवीन उत्साह घेऊन येतो. हा उत्साह, हा उल्हास मानवी मनापुरताच मर्यादित नसतो तर तो आपल्या भोवतीच्या सृष्टीतही आपल्याला जाणवतो - उजाडताच टवटवीत होणाऱ्या हिरवाईतून, किलबिलणाऱ्या पक्षांमधे. उगवणारा हा आगीचा गोळा जणू आपल्याला सांगत असतो - "मित्रा, गेला दिवस विसरून जा...कुढत बसू नकोस, रडू नकोस...हा घे एक नवीन दिवस...नव्याने सुरुवात कर आणि मस्त जग!"

पण सूर्योदय मनात जे भाव जागवतो ते सूर्यास्ताला नाहीच जमत. सूर्यास्त घेऊन येतो एक उदासवाणी हुरहुर, काळजी; दिसत नसलेल्या उद्याची. रात्री दर्शन देणारा चांदोबा आणि चांदण्याची मजा काही निराळीच. लहान मुलांना जिव्हाळ्याचा वाटणारा चंद्र - चंदामामा, त्यांच्या बालमनाला साद घालणाऱ्या लुकलुकणाऱ्या चांदण्या. तरुणांच्या मनात प्रेमाची कारंजी नाचवणारे ही हेच चंद्र-तारका.

सूर्योदयाबद्दल बोलताच, कौसानीच्या सूर्योदयाचे विलोभनीय चित्र डोळ्यासमोर तरळून जाते. आदल्या दिवशीच्या संध्याकाळी ढगांमुळे सूर्यास्त बघायला मिळाला नव्हता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी, सूर्योदयाकरता भल्या पहाटे गजर लावून धडपडत उठलो होतो आम्ही. उजाडायची चाहुल लागल्यामुळे पक्षीजगतात जाग झाली होती. आमच्या खोलीच्या बाल्कनीतून हिमाराजींची रूपरेषा दिसत होती - त्रिशुळ, नंदाघंटी, पंचचुली...अशी काही शिखरांची नावं आम्हाला नंतर कळाली. ह्ळूच सूर्याची किरणं एकेका शिखराला प्रकाशून आमच्यासमोर आणत होती. बघताबघता काळोखाची जागा उजेडानी घेतली. पर्वतांवर सोन्याचा मुलामा चढविला आहे असे वाटत होते. आकाशात पिवळ्या-लाल-केशरी रंगांची जणू उधळण झाली होती. असं मनात कायम कोरल्या गेलं आहे हे सूर्योदयाचे चित्र...

असो...सूर्योदयाचे वर्णन करणारं एक गाणं मला कुठल्याकुठे घेऊन गेलं पहा!....


कौसानीचा सूर्योदय

Monday, June 25, 2007

हौसेला मोल नाही



शिंपी आणि सोनार, ह्या समस्त महिलावर्गाचा छळ करायला अस्तित्वात आलेल्या जमाती आहेत, अशी माझी ठाम समजूत झाली आहे. आत्तापर्यंत माझा हा समज शिंप्यांपुरता मर्यादित होता. परंतू नुकतेच आलेल्या अनुभवांमुळे, सोनारही त्याच माळेतील मणी आहेत, असे मी बिनदिक्कतपणे म्हणीन. 'Promises are meant to be broken' ह्या उक्तीप्रमाणेच, दिलेला वायदा कधीच पाळायचा नसतो, हे ह्या जमातीचे ब्रीद आहे की काय असे मला वाटायला लागले आहे.

शिवायला टाकलेला कपडा असो, किंवा, हौसेने करायला टाकलेला दागिना; कधी एकदा वस्तू आपल्या हातात पडत्ये ह्याची आम्हाला उत्कंठा लागलेली असते. लहान-सहान गोष्टींतून आनंद घेणाऱ्या आम्ही बापड्या. मनातल्या कल्पनेला मूर्त स्वरूप मिळेपर्यंत, स्वप्नरंजनातूनच त्याचा कोण आनंद घेत असतो. पण ह्या मंडळींना हे कळेल तर शपथ! गिऱ्हाईकांना हेलपाटे घालायला लावणे, (कधी निर्विकारपणे, तर कधी उद्धटपणे बोलून) त्यांना मनस्ताप देणे, हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, अशा आविर्भावात ही मंडळी वावरत असतात. तशा आमच्या अपेक्षा काही फार नसतात हो! नुसत्या सौजन्यपूर्ण वागण्यानेही आम्हाला वश करता येईल, हे कोणी ह्या मंडळींना सांगेल काय? (खरंतर हेलपाटे मारायला लावून ही मंडळी आमच्यावर उपकारच करतात आणि त्याबद्दल त्यांचे आभारच मानायला हवेत; आजकालच्या बैठ्या जीवनशैलीत कुठलीही हालचाल व्यायामाला हातभारच लावते नाही का?)

'गिऱ्हाईक आमचा देव', हा विचार, भिंतीवर चिकटवलेल्या वचनाप्रमाणे ह्या मंडळींनी आपल्या वागण्या-बोलण्यात अंगीकारला तर किती बरे होईल! गिऱ्हाईकांशी सुसंवाद साधून, त्यांच्या मनातले जाणून घेऊन, जर ह्या मंडळींनी कार्य हातात घेतले, तर त्यांना समाधानी गिऱ्हाईक लाभतीलच, शिवाय, उभयतांचा, चुका दुरुस्तीकरणात खर्च होणारा अनावश्यक वेळही वाचेल. असो...माझ्या ह्या प्रेमळ सुचना कोणी माझ्या मित्रांपर्यंत पोचवेल तर फार बरे होईल. तोपर्यंत 'आलिया भोगासी असावे सादर' असे म्हणत हा छळ सहन करत रहाण्याशिवाय पर्याय नाही असे दिसते!

टीप: माझी मतं ही सर्वस्वी माझीच असून, ती पूर्णतः 'पुणेरी' अनुभवांवर आधारित आहेत. तुमच्यापैकी कोणाला ह्याहून वेगळे अनुभव आले असल्यास अवश्य कळवा.

Friday, May 18, 2007

अंगठी


काही केल्या बोटातून अंगठी निघतच नव्हती. नुकतंच झोपेतून उठल्यामुळे तिच्या हाताची बोटं किंचित सुजली होती. नेमकी अंगठीच्या जागी एक पुळी आली होती आणि त्यामुळे कधी एकदा अंगठी काढीन असं तिला झाले होतं. वर्ष झालं होतं तिला ती अंगठी घालायला; त्यांच्या घरच्या ज्योतिषीबुवांनीच सांगितली होती तिला पुष्कराजाची अंगठी घालायला. "अंगठी करून घाला; सगळं सुरळीत आणि व्यवस्थित पार पडेल." त्यांचं हे वाक्य ऐकताच तिचे बाबा तिला सोनाराकडे घेऊन गेले होते. खरतर तिला पहिल्या बोटात अंगठी घालायला मुळीच आवडत नसे; पण बाबांसमोर इलाज नव्हता! सोन्याच्या भावाने ज्या दिवशी उच्चांक गाठला होता त्याच दिवशी त्यांची अंगठीची खरेदी झाली होती. खडा ही चांगलाच घेतला होता. "आता दुनियेतली कुठलीही ताकद माझं बिघडवू शकत नाही," ती बाबांची चेष्टा करायची. आणि खरंच ६ महिन्यात आयुष्याची गाडी व्यवस्थित मार्गी लागली होती. पण काही केल्या बोटातून अंगठी मात्र निघत नव्हती.......

Sunday, April 15, 2007

नाळ

मृण्मयीला जाग आली तेव्हा उजाडूही लागलं नव्हतं. डोळे मिटून, पांघरूणात गुरफटून घेऊन तिने झोपण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण झोप गेली ती गेलीच. शेवटी ती पलंगावर उठून बसली आणि बाहेरचा कानोसा घेऊ लागली. त्यांच्या घराभोवतालच्या परिसरात भरपूर वनराई होती. साहजिकच अनेक प्रकारच्या पक्ष्यांचा तिथे वास होता. माणसं जरी पहाटेच्या साखरझोपेत गुरफटली होती तरी पक्षीजगतात मात्र जाग झाली होती.


पक्ष्यांचा ह्या प्रातः संमेलनामुळे पहाट प्रसन्न वाटत होती. मृण्मयी खिडकीपाशी गेली आणि जरावेळ ह्या मैफिलीत रमली. खिडकीतून वाऱ्याची एक झुळूक आली आणि त्याबरोबर मृण्मयीला फुललेल्या मोगऱ्याचा सुगंध जाणवला. तेवढ्यात आंब्यावरच्या कोकिळेने "कु ऊS उ" अशी साद दिली. मृण्मयीने गंमत म्हणून तिला प्रतिसाद दिला. थोडावेळ हा खेळ चालला. मृण्मयी स्वतःशीच हसली...


आकाशशी लग्न ठरल्यापासून मृण्मयी आनंदात होती. कसं एका क्षणात सगळं चित्र बदललं होतं. तिच्या विश्वाची व्याप्ती वाढली होती आणि इथून पुढे वाढणारच होती. लग्नाला तसा बराच अवकाश होता. लग्नानंतर मात्र ती तिच्या मातीपासून-माणसांपासून दूर-दूर जाणार होती. आता इथला प्रत्येक क्षण अनमोल होता आणि येणारी प्रत्येक अनुभुति मनाच्या खजिन्यात जपून ठेवावी अशी...


मृण्मयीने मनातल्या मनात यादीच केली...

  • बागेतल्या झाडांशी गप्पा मारणे...
  • पहाटे उठून पक्षी संमेलनाला हजेरी लावणे...
  • आजोबांबरोबर फिरायला जाणे...
  • आजीच्या कुशीत विसावणे...
  • भावंडांबरोबर, मित्र-मैत्रिणींबरोबर दंगा करणे...
  • आंब्याच्या मोहराचा, जाई-जुई-चाफा-मोगरा-रातराणीच्या गंधाचा भरभरून आस्वाद घेणे...
  • आई-बाबा नको नको म्हणाले तरीही रात्री त्यांचे पाय चेपून देणे...
  • उन्हाळ्यात गच्चीवर झोपणे, आकाशातल्या ताऱ्यांकडे बघत, गप्पा मारत झोपेच्या आधीन होणे...
  • संध्याकाळीच्या वारं अंगावर घेत तळ्याकाठी सुर्यास्त बघायला जाणे...
  • मनसोक्त खादडणे...
  • पावसात भिजणे...
  • गौरी-गणापतीच्या आरतीत रमणे...
  • हिवाळ्यात शेकोटीभोवती कोंडाळे करून गप्पा झोडणे...
  • घासाघीस करत खरेद्या करणे...


"हे काय मीनू, आज इतक्या लवकर उठून बसलीयेस", आईच्या आवाजाने मृण्मयी भानावर आली.


"काही नाही गं, असंच" मृण्मयी म्हणाली खरी, पण तिचे पाणावलेले टपोरे डोळे आईच्या सुक्ष्म नजरेतून सुटले नाहीत...

Saturday, March 03, 2007

त्रिवेणी


नंदनमुळे माझी 'त्रिवेणी' ह्या काव्यप्रकाराशी ओळख झाली. गुलझारांच्या त्रिवेणी ह्या काव्यसंग्रहाचा शांता शेळकेंनी केलेला अनुवाद वाचनात आला. गुलझारांची त्रिवेणीची संकल्पना मला फारच आवडली. अवघ्या दोन वाक्यात एखादा विचार मांडायचा आणि तिसऱ्या ओळीत त्या विचाराला वेगळे वळण द्यायचे किंवा त्याच विचाराला अधिक ठासवायचे - मला हे आव्हानात्मक वाटले. पहिली त्रिवेणी लिहिली आणि मग त्याचा छंदच लागला.


मला सुचलेल्या काही त्रिवेण्या तुमच्यापुढे मांडत आहे. त्या कितपत त्रिवेणीचे कायदे पाळतात हे तुम्हीच ठरवा आणि मला नक्की कळवा.


नको माणसांचा गोंगाट, वाहनांची वर्दळ...
मला शांतता हवी आहे.
पण मनातला दंगा शांत होईल तर शपथ!

~~~
"सुख देऊ का दुःख?" मला देवाने विचारले.
"अर्थातच सुख" मी चटकन म्हणाले.
दुःखामुळे सर्जनशीलता बहरणार असेल तर मी तेही सोसेन.

~~~
पैसा, प्रकृती, प्रेम, सौंदर्य, बुध्दी...
बरच लागतं हो जगायला!
मला मात्र स्वास्थ्य आणि माझा ध्यास पुरेसा आहे...

~~~
इ-युगातल्या लोकांचं भाग्य थोर,
संपर्काच्या, संवादाच्या सोयी अनेक.
आपल्याच माणसांपासून दूर जाणं हे ही त्यांचच नशीब!

~~~
प्रेम, राग, दया, असहायता, कृतज्ञता...अनेक भावना दाटतात जेव्हा मी तुझ्याबद्दल विचार करते.
तुला काय वाटत असेल माझ्याबद्दल?
टाळी एका हाताने थोडीच वाजते!

~~~
एखाद्याला समजून घेणे कठीण,
स्वतःच्या अपेक्षा त्याच्यावर न लादणे हे ही अवघड.
प्रत्येकजण असतो आरूढ आपल्याच ध्रुवावर!

~~~
एकमेकांशिवाय जगता न येणे हे खरं प्रेम?
का एकमेकांबरोबर आनंदाने जगता येणे हे खरं प्रेम?
प्रेमातही श्वास घ्यायला जागा हवीच की!

~~~
कधी कधी शब्दांनी व्यक्त होतं,
कधी डोळे बोलून जातात.
आपल्या नात्याला लाभलेली मनकवडेपणाची झालर मला सर्वात प्रिय आहे.

~~~
"मी तुझी आहे. मीही तुझाच आहे".
ते रोज एकमेकांना सांगत.
आजकाल प्रेमाची बेडी अडकविण्याच्या विरोधात तेच प्रचार करतात.

~~~
तो तिचा सुर्य होताच.
"तू माझी चंद्रकला होशील का?" तिच्या मनातलेच त्याने विचारले.
चंद्रावरच्या डागांच्या विचाराने तिचा होकार मात्र मनातच राहिला.

~~~
तुम 'क्यों' के पीछे पड़े हो,
मुझे 'क्यों' की पर्वा नही हैं...
कंबख्त दिल तो 'क्यों' जानकर भी बेहेकेगा!

~~~
तुमपे हक्क जताए भी कैसे,
ना तुम अपने हो ना हो पराये...
हम तो समझते हैं, पर दिल-ए-नादाँ...उसे कौन समझाए?


दुवे

Friday, February 16, 2007

दुधावरची साय

पिल्लांसाठी जीव तिचा झटत ऱ्हाय,
प्रेमापोटी ताठ ती उभी ऱ्हाय,
तिच्या मायेची पाखर घटत न्हाय,
दुधावरची साय, माझी बाय...

सुगरण बाय आमची हुश्शार हाय,
जगभराचं ज्ञान तिच्या पोतडीत हाय,
देव तिचा देवळात नसून कामात हाय,
दुधावरची साय, माझी बाय...

तरण्यांना लाजवील अशी उमदी माझी बाय,
दाग-दागिन्यांचा सोस नाही, नाविन्याचा हाय,
तिखट-गोड अशी तिची माय,
दुधावरची साय, माझी बाय...

Saturday, January 13, 2007

जुनं ते...


"पुरानी चीज से cover नही हटाते हैं, ....जो अच्छा लगे उसे ज्यादा से ज्यादा चलाते हैं,हम हिंदुस्तानी कहलाते हैं"

रेडिओवर जाहिरात लागली होती. भारतीयांच्या 'झिजेपर्यंत वापरा' किंवा 'पुरवून पुरवून वापरा' ह्या मानसिकतेला भावेल असेच उत्पादन होते. जाहिरात गमतीशीर होतीच पण त्याहीपेक्षा त्यात तथ्य होते. मला हसूच आले....

आता आमच्याच घरात बघा ना, प्रत्येक गोष्टीला आपला असा इतिहास आहे. अगदी वाटी-चमच्यापासून ते fridge, dining table पर्यंत. Dining table आई-बाबांच्या लग्नानंतरचं, तर fridge माझ्या पहिल्या वाढदिवसाचा. पलंग-कपाटं २० वर्षांपूर्वी नवीत घरात घेतलेली. प्रत्येक वस्तूने आपआपले काम चोख बजावले आहे, इतके, की घरातील प्रत्येक व्यक्तीचे ह्या वस्तूंवर आपआपल्या परीने भावबंध जुळले आहेत.

नाविन्याचा आणि सौंदर्याचा (थोड्याफार प्रमाणात का होईना) ध्यास असलेल्या आम्हाला, कधी-कधी, 'पूरे घर के बदल डालूँगा' अशी हुक्की येते. बदलाचे वारे घरात वाहू लागते.

"कशाला, सध्या काम भागतय ना? शिवाय आजकालच्या वस्तू तकलादू असतात...पूर्वीसारख्या चोख वस्तू कुठे मिळाणार आजकाल??" - इति मातोश्री"
सध्या आहे ते इतकंही वाईट नाहीये, नाही का? उगाच कशाला जुनं देऊन नवीन आणायचं!" - आमच्या मनातला बारिक आवाज.

असं झालं की आमचं बदलाचं आवसान गळून पडतं आणि नेहेमीच्या सरावलेल्या वातावरणात आम्ही पुन्हा स्थिरस्थावर होतो.

'जुनं ते सोनं' किंवा 'झिजेपर्यंत वापरा'चे नकळत आमच्यावरही संस्कार झाले आहेत. तरीही चेष्टा-मस्करी करताना आम्ही मातोश्रींना ह्यावरून भरपूर हसतो. पण ह्याबद्दल खोलवर विचार केला की जाणवतं की दोष व्यक्तीचा नाहीये. तो काळच तसा होता, अभावाचा - पैशाच्या अभावाचा, बाजाराच्या अभावाचा, ई. त्यामुळे आहे त्यात निभावण्याची मनाला आपोआपच सवय लागली असावी. अभिरूची, सौंदर्यदृष्टी असल्या संकल्पना ही तेव्हा अस्तित्वात नव्हत्या.

पण आता जमाना बदलला आहे. आजचा काळ आहे सुबत्तेचा, सहज मिळणाऱ्या पैशाचा, सुखसोयींचा. 'पैशाचं काय करायचं' हा प्रश्न लोकांना पडायला लागला आहे आणि 'खरेदी', हे बहुतांश लोकांना सापडलेलं सहज, सोप्पं उत्तर आहे. अनेक (नको असलेल्या?) वस्तूंची घरात रेलचेल दिसते. बऱ्याच वेळेला ह्या नवीन वस्तू, कार्यक्षम असलेल्या जुन्या वस्तू टाकून देऊन आणलेल्या असतात. आजकाल बाह्यरूपाला ही गुणवत्ते इतकेच(का थोडे जास्तीच?) महत्त्व प्राप्त झाले आहे.

असो. काय योग्य, काय अयोग्य हा प्रत्येकाचा व्यक्तिगत दृष्टिकोन आहे....तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं? अवश्य कळवा...

Thursday, January 04, 2007

फिदा

यंदाच्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचा चारही दिवस पूर्णपणे आनंद लुटता आला. महोत्सवात गायन-वादन सादर करणारे सर्व कलाकार उत्कृष्टच असतात; तरीही काहींच्या महफिली इतरांपेक्षा अधिक रंगतात आणि आठवणींच्या सुवर्णकुपीत कायमचं घर करतात. ह्या वर्षीचा महोत्सव कुणामुळे लक्षात राहील, असा प्रश्न मला कोणी विचारला तर एकच नाव डोळ्यासमोर येतं - 'कौशिकी चक्रवर्ती'.

कार्यालयातून थेट कार्यक्रमाला जायचं, मध्यरात्रीनंतर कधीतरी घरी पोचायचं की परत सकाळी लवकर कामावर हजर; असा काहीसा कार्यक्रमाच्या दिवसात माझा परिपाठ होता. महोत्सवाचा दुसरा दिवस होता. शिवकुमार शर्मांच्या संतूरवादनानंतर, पोट, बाहेरच्या खाण्या-पिण्याच्या stallsकडे खुणावू लागलं. पटकन पोटोबा उरकावा आणि हात-पायही मोकळे करावेत ह्या हेतूने मी बाहेर पडले. नंतरचे गाणे कौशिकी चक्रवर्तींचे होते. कौशिकी, ह्या पं अजय चक्रवर्तींच्या कन्या व शिष्या, ह्या पलिकडे, मला त्यांच्याबद्द्ल काहीच माहिती नव्हती......

सवाई गंधर्वला येणारे बहुतांश रसिकगण खवैयेही असावेत असे मला वाटते - जितकी गाण्याला तितकीच खाण्यालाही गर्दी असते! गर्दीतून वाट काढत कशी-बशी stallsपाशी पोचले. हवा तो पदार्थ मागवून मिळेपर्यंत आणि खाण्याकरता त्यातल्यात्यात निवांत कोपरा शोधण्यात थोडासा वेळ गेलाच. गर्दी असूनही ओळखीचे कोणीनाकोणीतरी भेटत गेले आणि नाही म्हटलं तरी च्याऊ-म्याऊचा आमचा फेरफटका लांबला. तेवढ्यात स्वरमंडपातून बहारदार ताना ऐकू येऊ लागल्या आणि त्याला मिळणारी रसिकांची मनमोकळी दादही. आता मात्र मला बाहेर थांबल्याचे थोडेसे अपराधीच वाटू लागले.

लगबगीने स्वरमंडपात पोचले तेव्हा राग रागेश्रीमधील 'मेरो मन हरवा...' ही बंदिश रंगात आली होती. गोल-गुबगुबीत चेहेरा, बंगप्रांतीय मुलींप्रमाणे नितळ-उजळ कांती, काजळ घातलेले विलक्षण बोलके डोळे आणि अतिशय लोभसवाणे स्मितहास्य - कौशिकींनी माझ्या ह्रदयात तत्काळ जागा मिळवली.

राग रागेश्रीनंतर कौशिकींनी एक सुरेख ठुमरी सादर केली - 'रंगी सारी गुलाबी चुनरिया रे.." कुठलीही कला सादर करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलाकाराची तयारी. परंतू जोपर्यंत त्या सादरीकरणात भाव उतरत नाही तोपर्यंत, ते सादरीकरण अपूर्णच, असे मला वाटते. शास्त्रीय संगीत, सामान्य माणसाला रुचेल अशा पद्ध्तीने सादर केले जात नाही असा बऱ्याच जणांचा आरोप असतो आणि तो मला काही अंशी पटतो देखील. कौशिकींचे गाणे मात्र थेट रसिकांच्या ह्रदयापर्यंत पोचत होते एवढे नक्की! त्यांचा आवाज, गाण्यात उतरणारा भाव आणि नजाकत, रसिकांवर अशी मोहिनी घालत होती की नकळत प्रेक्षकातील प्रत्येकाच्या मुखातून 'वाSSहSवा'ची बरसात होत होती.

कौशिकी जेव्हा गाणं संपवून उठल्या तेव्हा प्रेक्षकांनी त्यांना उभं राहून, टाळ्यांच्या गजरात निरोप दिला.

आज पुन्हा कौशिकींच्या स्वरगंगेत न्हायचा योग आला. बिहाग, मालकंस आणि त्यांनी पेश केलेल्या इतर नजराण्यांच्या धुंदीतच वावरत्ये मी!

Tuesday, August 15, 2006

कलियुग


काही महिन्यांपूर्वी घालवलेल्या एका दिवसावरून पहिल्या काही ओळी सुचल्या. आज डायरीची पानं उलगडताना ते शब्द पुन्हा नजरेस पडले आणि नवीन शब्द सुचू लागले. ह्यात मांडलेले विचार काही नवीन नाहीत...असो. नमनाला एवढे तेल पुरे...

औपचारिक गप्पा,
कोरडे संभाषण,
खोटे हास्य..

बोथट संवेदना,
बंद दरवाजे,
संकुचित मनं...

नात्यांचा गुंता,
वेळेचा अभाव,
वेगवान जीवन...

खळखळणारा पैसा,
बिघडलेलं स्वास्थ्य,
बेचैन मनं...

संपर्क माध्यमांचा सुकाळ पण माणसांची एककल्ली बेटं...

Thursday, August 10, 2006

नेमेचि येतो पावसाळा


सध्या कार्यालय-घर हा प्रवास फारच वेळ घेऊ लागला आहे. कारण सांगायलाच नको - पाऊस, रस्त्यांवरील खड्डे (नव्हे खड्डयामधील रस्ते..) आणि शिस्तप्रिय पुणेकर! काल गाडी इंच-इंच पुढे दामटत असताना "नेमेचि येतो पावसाळा" ह्या काव्यपंक्ती आठवल्या. मनातली चडफड hornद्वारे व्यक्त करण्याशिवाय गत्यंतर नव्ह्ते. रस्ता मोकळा होण्याची वाट बघता बघता, मनात शब्दखेळ सुरू झाला. त्या खेळाला अर्थपूर्ण बनविण्याचा हा एक सूक्ष्म प्रयत्न.

नेमेचि येतो पावसाळा...
नभ वसुधेचा मिटतो अबोला,
रंगतो भूमंडळी मिलन सोहळा,
मृद्गंधाची धुंदी नाही असा विरळा...

नेमेचि येतो पावसाळा...
मंडूक गायनाला येतो उमाळा,
बालपणीच्या आठवणींना मिळतो उजाळा,
झुलते मन हर्षोल्लासाचा हिंदोळा...

नेमेचि येतो पावसाळा...
सोडून जातो खड्डयांचा गोतावळा,
कुंद वासाचा येतो उबाळा,
सूर्यकरांची ओढ लावी जिवाला...

तरी मज वाटे त्याचा जिव्हाळा,
सर्जनशीलतेचा फुलवी पिसारा...
नेमेचि यावा पावसाळा...
नेमेचि यावा पावसाळा...

Friday, August 04, 2006

मराठी पुस्तकांविषयी थोडेसे..


नंदनने मला ह्या खेळात सामील करून घेतले. खेळाविषयी अधिक माहिती करता - http://marathisahitya.blogspot.com/2006/05/blog-post.html

१. सध्या वाचनात असलेले/शेवटचे वाचलेले वा विकत घेतलेले मराठी पुस्तक.
~ 'रारंग ढांग' - प्रभाकर पेंढारकर

२. वाचले असल्यास त्याबद्दल थोडी माहिती.

~ नुकतीच सुरूवात केली आहे, त्यामुळे लेखकाच्या शब्दात सांगायचे तर - "एका बाजूला हिमालय व लहरी निसर्ग, दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या स्वभावाची पण सारख्याच जिद्दीची माणसे! निसर्गात आणि माणसांत जशी येथे रस्सीखेच व संघर्ष, तसाच प्रसंगी माणसामाणसातही! त्याची ही कथा."

३. अतिशय आवडणारी/प्रभाव पाडणारी/(इतक्यात वाचलेली) ५ पुस्तके.
~ 'बदलता भारत' - भानू काळे
~ 'स्मृति-चित्रे' - लक्ष्मीबाई टिळक
~ 'अरबी भाषेंतील सुरस व चमत्कारिक गोष्टी' - कै. कृष्णशास्त्री चिपळूणकर, कै. विष्णूशास्त्री चिपळूणकर, कै. हरि कृष्ण दामले
~ 'वाइज ऍन्ड अदरवाइज' - सुधा मूर्ती (मराठी अनुवाद)
~ 'मी कसा झालो' - आचार्य अत्रे

४. अद्याप वाचायची आहेत अशी ५ मराठी पुस्तके.
~ 'आमच बाप अन आम्ही' - नरेंद्र जाधव
~ 'ययाति' - वि.स. खांडेकर
~ 'दासबोध' - समर्थ रामदासस्वामी
~ Sorry can't think of more right away.

५. एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे.

~ 'अरबी भाषेंतील सुरस व चमत्कारिक गोष्टी' - शाळेत शिकत असताना, एका सुट्टीत गावी गेले होते. त्यावेळी तिथल्या घरी मला ह्या ५ पुस्तकांचा संच सापडला. पुस्तकांची पानं जीर्ण झाली होती; अगदी जपून पुस्तकं हाताळायला लागत होती. ह्यातल्या गोष्टी, वाचणाऱ्याला, एका वेगळ्याच अद्भुत विश्वाची (राजकुमार-राजकन्या, त्यांच्या चमात्कारिक शक्ती, गोष्टी..) सफर घडवून आणतात. ह्यामुळेच माझ्या बालमनाला ती पुस्तके भावली असतील असे वाटते. त्यावेळी मला खजिना गवसल्यासारखे वाटले होते; अजूनही मी ती पुस्तक जपून ठेवली आहेत.

~ इतक्यात वाचनात आलेल्या 'बदलता भारत' हे पुस्तक मला फार आवडले. त्या बद्दल थोडेसे इथे - http://dhyaas.blogspot.com/2005/12/blog-post.html

ह्य खेळात सहभागी व्हायला मी ह्यांना निमंत्रित करते -

Saturday, July 01, 2006

रंगरंगोटी


गेला महिनाभर घरात रंगाचे काम सुरू आहे. बऱ्याच दिवसापासून ह्या कामाला मुहुर्तच लागत नव्ह्ता. तसं रंगकाम बरेच जिकीरीचे काम - रंगाचा वास, घरभर धूळ-पसारा, सामानाची बांधाबांध, हालवा-हालव आणि नंतर आवराआवर; नुसत्या विचारानेच नकोसे वाटते. अखेर काम करायचे निश्चित झाले. मग सतराशे-साठ catalogues बघून रंग संगती, रंगाचे प्रकार वगैरे ठरविण्यात आले.

सर्व रंगाऱ्यांनी मन लावून काम केले. नवीन रंगाचा लेप लावण्यापूर्वी प्रत्येक भिंत घासून काढण्यात आली. आवश्यक असल्यास लांबी लावून ती एकसारखी करण्यात आली आणि मगच त्यावर नवीन रंग चढविण्यात आला. रंगकामानंतर जणू आमच्या घराचा कायापालटच झाला!...सर्व काही चकाचक, नवीन भासू लागले. घरात प्रवेश करताच उत्साही वाटते.

असो, ह्या लेखाचा उद्देश रंगपुराण कथन करणे हा नाही. परवा मनात सहज विचार तरळून गेला - आपलं मनही एखाद्या घरासारखेच आहे. घरात माणसं रहातात, तर मनात विचार वास करतात. घर सुबक, नीट-नेटकं दिसावं ह्याकरता आपण सतत झटत असतो. नव-नवीन सामान आणून त्याची सुबक रचना कर, घराला रंगरंगोटी कर......पण मनाचं काय? आपलं मन कसं आहे ह्याचातरी आपण वेळोवेळी ठाव घेतो का? आपल्या मनातील विचारच आपल्या आयुष्याची दिशा ठरवत असतात. मग ह्या विचारमंदिराच्या भिंतीही वेळोवेळी नवीन विचारांनी रंगवायला नकोत का? जुन्या, कालबाह्य विचारांना घासून काढून, त्यावर नवीन विचारांचा रंग चढवायलाच हवा.

आजच्या दहिवरासम जगात तग लागण्याकरता आणि आयुष्य समरसून जगण्याकरता, मनावर नवविचारांची रंगरंगोटी, कितीही नकोशी, अवघड वाटली तरीही, आवश्यकच नाही का?

पावसाच्या गोष्टी - ॥३॥

'कॉफी हाऊस' च्या वरच्या मजल्यावरच्या नेहेमीच्या जागेवर ते दोघे बसले. हे त्या दोघांच आवडीचं ठिकाण होतं. इथे निवांत गप्पा मारत-कॉफी पित बसायला त्यांना आवडायचं. अशी निवांत ठिकाणच हळूहळू नाहिशी होत होती. अर्थात, दोघं नोकरीला लागल्यापासून, त्यांच्या आयुष्यातला निवांतपणाही जवळपास लुप्तच झाला होता. तरीही ८-१५ दिवसांत एकदातरी वेळ काढून भेटायचेच असा त्यांनी नेम केला होता.

३ वर्षांपूर्वी इथेच त्यांची प्रथम ओळख झाली होती. University मध्ल्या वार्षिक 'India Night'च्या नियोजनाविषयी चर्चा करायला, committeeने येथे भेटायचे ठरवले होते. दोघेही त्याच वर्षी PhD करायला म्हणून तिथे दाखल झाले होते. अभ्यासाचे विषय वेगवेगळे असले तरी - नवीन देश, कला-संगीत-भटकंती-माणसं अशा समान आवडी, मोकळे, गप्पिष्ट स्वभाव ह्यामुळे त्यांची लगेच गट्टी जमली.

पण आज गप्पा मारायला फुरसत नव्ह्ती. त्यांच्या मित्र परिवाराने आयोजित केलेल्या गाण्याच्या कार्यक्रमाच्या निवेदनाची जबाबदारी दोघांकडे सोपविण्यात आली होती. कार्यक्रम १५ दिवसांवर आला होता तरी त्यांची काहीच तयारी झाली नव्हती. आज किमान कच्चा मसुदा लिहून काढायचा असा दोघांनी निश्चय केला होता.

कॉफीचे घुटके घेत, चर्चा करत, मनातले विचार कागदावर उतरविण्यात ते मग्न होते. त्याचे अक्षर चांगले म्हणून लिखाणाचे काम तिने नेहेमीप्रमाणे त्याच्यावर ढकलले होते. ३-४ कॉफीच्या फेऱ्यांनंतर, तब्बल २-२.५ तासांनी ते विसावले. काम मनासारखे झाले म्हणून दोघेही खुश होते.

थोडावेळ गप्पा मारून घरी जावे असे त्यांनी ठरवले. इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. पावसाळ्याचे दिवस असूनही बाहेर सुर्य तळपत होता. हळूहळू गप्पा रंगात आल्या - कॉलेजच्या दिवसांच्या आठवणी, गमती-जमती, सध्याची धकाधकीची दिनचर्या...

लख्ख ऊन होतं आणि पावसाला सुरूवात झाली होती. ऊन्हामुळे पाण्याचे थेंब चकाकत होते. मोठे मनोरम दृश्य होते. तिने त्याचे लक्ष बाहेरच्या पावसाकडे वेधले. दोघेही गप्पा विसरून पावसात हरवले. काही क्षण असेच गेले. अचानक त्याचे लक्ष काचेवर पडलेल्या तिच्या हसऱ्या प्रतिबिंबाकडे गेले. त्याला प्रथमच तिचे सौंदर्य जाणवले. तो स्वतःशीच हसला. दोघांनी एकमेकाकडे पाहिले - डोळे मनातलं सर्व काही बोलून गेले. पाऊस जितका अचानक आला तितकाच अचानक थांबला....दोघांच्याही नकळत, अनाहूतपणे, त्यांच्या आयुष्याच्या एका नवीन सोनेरी पर्वाची सुरूवात झाली होती.

पावसाच्या गोष्टी - ॥२॥

काळे ढग दाटू लागले आणि आभाळ गडगडू लागलं. उष्म्याने आसुसलेले जीव आपापल्या फ्लॅटच्या बाल्कनीत जमू लागले. एखादीतरी जोरदार सर यावी आणि वातावरण थोडे थंड व्हावे असे प्रत्येकालाच मनोमन वाटत होते. काळ्या ढगांची गर्दी वाढली, तशी, लहान-मोठ्यांच्या मनातली ही इच्छा पूर्ण होणार अशी खात्री वाटू लागली.

रविवार असल्यामुळे बरीचशी लोकं घरीच होती. काही मंडळी आकाशाकडे आशाळभूत नजरेने बघत होती, तर काही गप्पांमधे रमली होती. एरवी आपापल्या फ्लॅटच्या बंदिस्त विश्वात मग्न असलेली माणसं, येणाऱ्या पावसाच्या निमित्ताने का होईना, एकमेकांशी संवाद साधत होती. वातावरणात एक वेगळाच उत्साह होता.

एखाद्या स्वागत समारंभात गुलाब पाण्याचा शिडकावा व्हावा तसे काही थेंब पडले. हळूच ह्या थेंबांचा जोर वाढला, मधेच थोडावेळ थांबला आणि अचानक परत सुरू झाला; जणू ढगाआड लपलेला एखादा खट्याळ मुलगा पाण्याच्या पिचकारीने जमिनीवरच्या मंडळींना चिडवत होता. मनातला उल्हास शब्दावाटे बाहेर पडू लागला.

हे असे तुरळक थेंब येताच, खालच्या आवारात पोरांची गर्दी जमली. मुलं त्यांच्या-त्यांच्या दंगा-मस्तीत रममाण झाली. बाललीला बघण्यात मोठेही दंग झाले. अचानक पाऊस यायला लागला - रप-रप-रप-रप. मुलांचा किलबिलाट आणखीनच वाढला.

"अरे, पावसात भिजू नकोस. चल ये वरती...."
"सर्दी-खोकला झाला की मग बघ हं..."
"भिजलीस-तब्येत बिघडली आणि शाळेचा पहिला दिवस बुडाला की बघ तूच काय ते सांग तुझ्या बाईंना...."


साधारण असे काहीसे संवाद प्रत्येक बाल्कनीतून ऐकू येत होते. पण पोरच ती, ती कसली जुमानताहेत!

"मम्मा, प्लीज प्लीज, प्लीSज," रिया सोनालीभोवती नाचत होती. "मला पन पावशात खेलायचय!".....फक्त १० minutes प्लीSज". अखेर सोनाली विरघळली. "Thaaankss!" सोलालीला पटकन मिठी मारून रियाने खालती धूम ठोकली. "लवकर ये हं," सोनालीचे शब्द रियापर्यंत पोचलेच नाहीत. तब्बल पाऊण तासानंतर पाऊस थांबला. स्वच्छ कोरडे कपडे घालून रिया पुन्हा खाली आली. तिचा आणि तिच्या मैत्रिणींचा, पाण्यात होड्या सोडायचा नवीन खेळ सुरू झाला होता. सोनाली बाल्कनीतून लेकीला कौतुकाने न्याहाळत होती.

"मSम्माS, हे बघ, माझी बोSट," रिया हात उंचावून, सोनालीला, तिने बनवलेली होडी दाखवत होती. आईची शाबासकी मिळताच, रियाने होडी पाण्यात सोडली; उतार असल्यामुळे होडी पुढे जाऊ लागली. "मम्माS बोट जाते का गं, बाबांकडे? अमेरिकेला..."

प्रश्नाच्या उत्तराकडे रियाचे लक्षच नव्हते. पुढे जाणाऱ्या बोटीकडे बघण्यात, बाबांच्या भेटीच्या स्वप्नरंजनात रिया केव्हाच हरवली होती. दूरदेशी असलेल्या साहिलच्या, रियाच्या बाबांच्या आठवणीने मात्र सोनालीचे डोळे नकळत भरून आले.

Sunday, June 18, 2006

पावसाच्या गोष्टी - ॥१॥

फेटा सारखा करून, खांद्यावर उपरणं टाकत नाम्या खाटेवरून उठला. "जनेS, येतो गं," असं म्हणत बाहेर जायला निघाला. नाम्याची हाक ऐकताच जनी दारी आली. "आवं," डोक्यावरचा पदर सावरत तिने नाम्याला हाक मारली. नाम्याने नुसतीच मान वळवली आणि तिच्याकडे प्रश्नार्थक नजर रोखली. "लवकर येताय न्हवं....बस्ता बांधाया तालुक्याला जायचयं......लक्षात हाय न्हवं...," जमिनीकडे बघत, हलक्या आवाजात तिने नाम्याला लवकर परतायची आठवण करून दिली. "व्हय व्हय, हाय लक्षात," नाम्या जरा गुरकतच म्हणाला आणि चालू लागला. जनी घरात गेली आणि कामाला लागली, पण त्यात तिचे लक्ष लागेना. नाम्याच्या काळजीने तिचा चेहेरा उतरला...

नाम्याचं डोकं आजकाल ठिकाणावरच नसायचं. तीन वर्ष सतत दुष्काळ आणि गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे शेतात पीक असं काही झालच नव्हतं. शेतीकरता घेतलेलं कर्ज वाढतच चाललं होतं. पावसाच्या-पीकाच्या-कर्जाच्या काळजीने नाम्याला पार पोखरून काढले होते. त्यात यंदा चंपीचं लगीन करायचं होतं. ह्या वर्षीही पावसाने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे नाम्या अधिकच हताश झाला होता.

"ए बाय....बाहेर अंधारून आलय....ये बघ." चंपीच्या आवाजाने जनीची तंद्री भंग पावली. भानावर येत ती "आले, आलेS," म्हणत उठली. परसदारी चंपी हसत काळ्या ढगांकडे बघत होती. जनी बाहेर येऊन आकाशाकडे बघत, हात जोडून काहीतरी पुटपुटली....मग एक सुस्कारा सोडत स्वतःशीच हसली. "बाय, चल बा कडं शेतावर जाऊ," चंपी उत्साहाने म्हणाली. "चल काहीतरीच," असं म्हणत जनीनं तिला उडवून लावलं. पण चंपीनं लकडाच लावला तेव्हा जनी तयार झाली.

पावसाच्या आत शेतावर पोचता यावं म्हणून दोघी लगबगीनं निघाल्या. सुसाट्याचा वारा सुटला होता; छोटी धुळीची वादळं उठवत होता. आकाशात मोठ्ठाल्ले काळे ढग दाटले होते आणि मधूनच गडगडण्याचा आवाज येत होता. जनी-चंपी शेतात पोचल्यातोच टप्पोरे थेंब पडू लागले. बघता-बघता पावसाचा जोर वाढला. जनी-चंपी खिदळत पळायला लागल्या. पावसाचा जोर आणखी वाढला. मुसंडी मारून पळत त्या जवळच्या आंब्याच्या झाडाच्या आडोशाला पोचल्या. चंपीने चेहेरा पुसायला तोंड वर केले, पण समोरचे दृश्य पाहून ती हबकली. "बाSय" एवढेच ती कशीबशी किंचाळली.

फासावर लोंबकळणाऱ्या नाम्याचा निर्जीव देह पाहून जनी तिथल्या-तिथेच थिजली. तिच्या थिजलेल्या नजरेतून एक नवीन पाऊस सुरु झाला होता आणि तुटलेल्या काळजात एक नवीन वादळ...

Sunday, April 09, 2006

घेऊया अंगावरी पावसाच्या सरी....

परवा रात्री दै. लोकसत्तेची 'चतुरा' पुरवणी चाळत होते. त्यातील 'प्रतिसाद' ह्या सदराने लक्ष वेधले. एखादी (वाचकांनी पाठवलेली) ओळ देऊन, वाचकांना त्यावर आधारित कविता करायचे आवाहन करायचे, असे काहीसे त्याचे स्वरूप आहे. मेंदूला चालना म्हणून मी प्रयत्न करायचे ठरवले. दुसऱ्या दिवशी सुट्टी असूनही एका training करता officeला जायचे होते. कवितेचा विषय तसा मनात घोळतच होता आणि चक्क दुपारी चहाच्या सुट्टीत सहजपणे कविता सुचली.

करूया एकदातरी पंढरीची वारी,
नाचूया आनंदे, म्हणत हरी-हरी.
बसूया थोडावेळ देवाचिये द्वारी,
घेऊया अंगावरी पावसाच्या सरी....

नांदूया सौख्यभरे आपापल्या परी,
गाऊया मस्त, मारत सायकलवरून फेरी.
बागडूया स्वच्छंद घेत स्वतःभोवती घेरी,
घेऊया अंगावरी पावसाच्या सरी....

खेळूया निवांत पिल्लांशी दारी,
हसूया मनमोकळे, स्वतःवरती तरी!
खाऊया मनसोक्त भाजी-भाकरी,
घेऊया अंगावरी पावसाच्या सरी....

झोपूया निर्धास्त मायेचिया घरी,
जगूया बिनधास्त विसरून चाकरी.
बघूया करून स्वप्नांवरी स्वारी,
घेऊया अंगावरी पावसाच्या सरी....

Saturday, March 11, 2006

राजा - एक स्मरण

आज पावसाने अचानक हजेरी लावली. मला पाऊस नेहेमीच आवडतो. म्हणून रात्रीचं जेवण झाल्यावर, ओसरीतले दिवे मालवून, मी तिथल्या आरामखुर्चीवर विसावले. हवेत हलकासा सुखद गारवा होता, मातीचा मंद गंध आसमंतात दरवळत होता. रात्रीची नीरव शांतता अधून-मधून भंग करणारे गडगडणारे आभाळ आणि पावसाच्या थेंबांची टपटप; मन सहज भूतकाळात गेले.

मी आठवीत शिकत होते, नोव्हेंबर महिना होता. बाबा कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. संध्याकाळी, एक काका-काकू आमच्या घरी आले; माझी त्यांची ओळख नव्हती. त्यांच्याकडील nylonच्या जाळीदार पिशवीतून त्यांनी हळूच एक गोंडस Pomeranian कुत्र्याचे पिल्लू काढले. पांढऱ्याशुभ्र केसाचे ते गोंडस गुबगुबीत पिल्लू, एखाद्या कापसाच्या किंवा बर्फाच्या गोळ्यासारखेच भासले. प्राण्यांची आवड असणाऱ्या माझ्या धाकटया बहिणीला ते पिल्लू पाहून कोण आनंद झाला! कुत्र्यांची भीती वाटणारी मी मात्र, दुरूनच त्याला कौतुकाने न्याहाळत होते. बाबा गावाहून आल्यावर ह्या गोंड्याचे, 'राजा' असे नामकरण करण्यात आले. मातोश्रींनी गोंड्याला घरात आणण्याच्या विरोधात बंड पुकारलं, परंतू अखेर आमच्याकरता म्हणून माघार घेतली. (का गोंड्याच्या रूपाने तिला भुरळ घातली कोण जाणे! अजूनही पाळीव प्राणी हा आमच्या घरातील एक संवेदनशील विषय आहे!....असो.)

हळूहळू माझी राजा बाबतची भीड चेपली. नव्या नवलाईच्या दिवसात, राजाला आंघोळ कोण घालील, खायला कोण देईल, फिरायला कोण नेईल, केस कोण विंचरेल, प्रत्येक गोष्टीवरून आम्हा बहिणीत भांडणं होत. आमची भांडणं असह्य झाली की बाबा, राजाला 'कुणाला तरी देऊन टाकीन' अशी धमकी देत, की मग आम्ही चिडी-चूप!

Pomeranian कुत्री म्हणे हट्टी असतात. आमचा राजाही त्याला अपवाद नव्हता. आम्ही सगळे घरात असलो, किंवा पाहुणे आल्यावर घरात गप्पा रंगल्या की राजालाही त्यात सहभागी व्हायचे असायचे. अशावेळी, भुंकून, आरडाओरडा करून तो स्वतःला आमच्या कंपूत सामील करून घ्यायचा. घरात घेतल्याशिवाय तो शांतच होत नसे; जिथे माणसं तिथे तो रमायचा.

त्याला औषध घ्यायला लावणे हा एक कसरतीचा प्रकार असायचा. जेवणात औषध आहे, हे पट्ठयाला बरोबर कळायचे. जेवणात लपविलेली औषधाची गोळी वगळून तो सर्व काही संपवायचा तर कधी औषधाचा सुगावा लागल्यावर उपाशी रहायचा. ब्रेड त्याला अतिशय प्रिय, म्हणून आम्ही कधी, ब्रेडच्या तुकड्यात औषधाची गोळी लपवून औषध त्याच्या गळी उतरवायचो, तर कधी तो काहीही केलं तरी गोळी थूंकून आम्हाला वैताग आणायचा!

राजाच्या खाण्यापिण्याच्या आवडीही त्याच्या नावाप्रमाणेच राजेशाही होत्या. ब्रेड आणि भात म्हणजे जीव की प्राण! गोडाचे सर्व प्रकार खायला सदैव तयार. आवडीच्या मेव्याचा सुगावा लागताच, त्याच्या चेहेऱ्यावरचे भाव बदलायचे. 'मला खाऊ हवाय' अशी आर्जव त्याचे डोळे करत. थोडं त्याला चिडवायला, थोडं आमच्या मनोरंजनाकरता, आम्ही त्याला आमच्या मागे-पुढे, त्याच्या मागच्या २ पायांवर नाचवत असू. कधी खाऊ लपवून त्याला शोधायला लावत असू तर कधी त्याला उडी मारून खाऊ झेलायला लावत असू.

बागेत येणाऱ्या मांजरींचा, राजाला पाठलाग करायला लावणे हा ही आमचा एक आवडता छंद होता. लहान मुलांना जसे कधी-कधी पोलिसांचा धाक दाखवून, मोठे त्यांच्या मनाप्रमाणे वागवतात, तसा, आम्ही ह्या मांजरींचा वापर, राजाला आमच्या मनासारखे करायला लावायचे असले की करायचो. उदा. राजा उगाच जेवताना नखरे करायला लागला की -

मी - "राजा तुला हे इतकं छान जेवण नकोय नं! जा, त्यापेक्षा त्या शेजारच्या शहाण्या मनीला देते हे."
बहिण - (राजाचं जेवण असलेलं वाडगं उचलून बाहेर नेत)"म्यांव, म्यांSSSव"

बहुतेकवेळा आमच्या ह्या अभिनयाला आणि दटावणीला राजा बळी पडायचा; वाडग्यातलं अन्न झटपट फस्त करायचा. पण कधी कधी मात्र आम्हाला हार मानून त्याच्यापुढे हात टेकायची पाळी यायची. राजा हट्टाला पेटला की खरच आमचा अगदी अंत बघायचा. मग कधी बोलणी, कधी धपाटे खायचा. असा प्रसाद मिळाल्यावर, तो इतक्या केविलवाण्या नजरेने बघायचा की माणूस विरघळलंच म्हणून समजा. काही वेळापूर्वी त्याच्या अंगावर ओरडणारी मी मग, "भुभ्या, सोन्या" करत त्याच्या गळ्यात पडायचे. माझ्या बहिणीची तर त्याच्याशी बोलायची एक वेगळीच भाषा होती!

आम्ही बहिणी जरी राजाच्या प्रेमाकरता भांडलो, तरी त्याची आवडती व्यक्ती म्हणजे आमची आजी! गमतीने आम्ही राजाला 'आजीचं शेपूट' असं चिडवायचो. "आपला आणि ह्याचा काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे", असं आजी नेहेमी म्हणायची.

अनेक आजारपणातून तो सावरला, पण शेवटी-शेवटी तो फारच थकला. सांधेदुखीने व दम्याने त्याचे जिणे नकोसे केले. आम्हाला त्याच्या यातना बघवेनात. अखेर मनावर दगड ठेवून, आम्ही त्याला निरोप द्यायचा निर्णय घेतला. आजही राजा म्हटलं की त्याची विविध लोभसवाणी रूपं डोळ्यासमोर तरळतात. टपोऱ्या, चमकदार डोळ्यांतून संवाद साधणारा राजा, हर्षवायू झाल्यागत शेपटी हालवून माणसाचे स्वागत करणारा राजा, झोपेतून उठल्यावर आळस देणारा राजा, पुढचे पाय पुढे आणि मागचे पाय मागे पसरून ऐटीत बसणारा राजा.

१२-१३ वर्षाच्या सहवासात राजाने आम्हाला भरभरून प्रेम दिले आणि आठवणीच्या कप्प्यात जपून ठेवावे असे कितीतरी सोनेरी क्षण. आज वर्ष झालं त्याला जाऊन, तरी, अजूनही, एखाद्या संध्याकाळी थकून-भागून घरी परतताना असं वाटतं की, धावत, शेपटी हालवत, गोंड्या फाटकाशी येईल!

Saturday, February 11, 2006

ती

ही माझी पहिली कविता. अवचितपणे, काल पहाटे सुचलेली. सकाळी मनात घोळत असलेले शब्द लिहून काढले आणि मग रात्री वेळ मिळाल्यावर त्यांना कवितेत बांधले. मला कल्पना आहे की माझी कविता, पद्याचे अनेक नियम मोडते. वास्तविक माझं काव्यवाचन नगण्य आहे. कुणी वाचून दाखवली तर कविता ऐकायला मला आवडते (आळसाचा कळस!?) आणि तेव्हा झालेल्या चर्चेतून मला ती अधिक चांगली कळते. हे नमनाचे घडाभर तेल, माझ्या कवितेच्या समर्थनार्थ आहे, हे एव्हाना तुम्हा सुज्ञ वाचकांच्या लक्षात आले असेलच! ;) असो...

तुमच्या सुचनांनी मला माझ्या कवितेतील त्रुटी कळतील आणि सुधारता येतील ह्या अपेक्षेने, माझी कविता इथे प्रदर्शित करायचे धाडस करत आहे...

ती - माणसांत असूनही एकटी,
जगात असूनही नसल्यासारखी.

ती - प्रश्नांच्या भोवऱ्यात उत्तरं शोधत,
जिवंत असूनही स्वतःच्या अस्तित्वाचा उद्देश शोधत.

ती - वाट सापडली आहे असे वाटूनही,
पथदर्शक शुक्राच्या शोधात,

कधी, कुठे उलगडतील ही कोडी??
कुणास ठाऊक....

एव्हाना तिला उमजलय फक्त एवढच,
हा शोध, ही साधना, करायची असते प्रत्येकाने स्वतःच!