Saturday, July 01, 2006

रंगरंगोटी


गेला महिनाभर घरात रंगाचे काम सुरू आहे. बऱ्याच दिवसापासून ह्या कामाला मुहुर्तच लागत नव्ह्ता. तसं रंगकाम बरेच जिकीरीचे काम - रंगाचा वास, घरभर धूळ-पसारा, सामानाची बांधाबांध, हालवा-हालव आणि नंतर आवराआवर; नुसत्या विचारानेच नकोसे वाटते. अखेर काम करायचे निश्चित झाले. मग सतराशे-साठ catalogues बघून रंग संगती, रंगाचे प्रकार वगैरे ठरविण्यात आले.

सर्व रंगाऱ्यांनी मन लावून काम केले. नवीन रंगाचा लेप लावण्यापूर्वी प्रत्येक भिंत घासून काढण्यात आली. आवश्यक असल्यास लांबी लावून ती एकसारखी करण्यात आली आणि मगच त्यावर नवीन रंग चढविण्यात आला. रंगकामानंतर जणू आमच्या घराचा कायापालटच झाला!...सर्व काही चकाचक, नवीन भासू लागले. घरात प्रवेश करताच उत्साही वाटते.

असो, ह्या लेखाचा उद्देश रंगपुराण कथन करणे हा नाही. परवा मनात सहज विचार तरळून गेला - आपलं मनही एखाद्या घरासारखेच आहे. घरात माणसं रहातात, तर मनात विचार वास करतात. घर सुबक, नीट-नेटकं दिसावं ह्याकरता आपण सतत झटत असतो. नव-नवीन सामान आणून त्याची सुबक रचना कर, घराला रंगरंगोटी कर......पण मनाचं काय? आपलं मन कसं आहे ह्याचातरी आपण वेळोवेळी ठाव घेतो का? आपल्या मनातील विचारच आपल्या आयुष्याची दिशा ठरवत असतात. मग ह्या विचारमंदिराच्या भिंतीही वेळोवेळी नवीन विचारांनी रंगवायला नकोत का? जुन्या, कालबाह्य विचारांना घासून काढून, त्यावर नवीन विचारांचा रंग चढवायलाच हवा.

आजच्या दहिवरासम जगात तग लागण्याकरता आणि आयुष्य समरसून जगण्याकरता, मनावर नवविचारांची रंगरंगोटी, कितीही नकोशी, अवघड वाटली तरीही, आवश्यकच नाही का?

पावसाच्या गोष्टी - ॥३॥

'कॉफी हाऊस' च्या वरच्या मजल्यावरच्या नेहेमीच्या जागेवर ते दोघे बसले. हे त्या दोघांच आवडीचं ठिकाण होतं. इथे निवांत गप्पा मारत-कॉफी पित बसायला त्यांना आवडायचं. अशी निवांत ठिकाणच हळूहळू नाहिशी होत होती. अर्थात, दोघं नोकरीला लागल्यापासून, त्यांच्या आयुष्यातला निवांतपणाही जवळपास लुप्तच झाला होता. तरीही ८-१५ दिवसांत एकदातरी वेळ काढून भेटायचेच असा त्यांनी नेम केला होता.

३ वर्षांपूर्वी इथेच त्यांची प्रथम ओळख झाली होती. University मध्ल्या वार्षिक 'India Night'च्या नियोजनाविषयी चर्चा करायला, committeeने येथे भेटायचे ठरवले होते. दोघेही त्याच वर्षी PhD करायला म्हणून तिथे दाखल झाले होते. अभ्यासाचे विषय वेगवेगळे असले तरी - नवीन देश, कला-संगीत-भटकंती-माणसं अशा समान आवडी, मोकळे, गप्पिष्ट स्वभाव ह्यामुळे त्यांची लगेच गट्टी जमली.

पण आज गप्पा मारायला फुरसत नव्ह्ती. त्यांच्या मित्र परिवाराने आयोजित केलेल्या गाण्याच्या कार्यक्रमाच्या निवेदनाची जबाबदारी दोघांकडे सोपविण्यात आली होती. कार्यक्रम १५ दिवसांवर आला होता तरी त्यांची काहीच तयारी झाली नव्हती. आज किमान कच्चा मसुदा लिहून काढायचा असा दोघांनी निश्चय केला होता.

कॉफीचे घुटके घेत, चर्चा करत, मनातले विचार कागदावर उतरविण्यात ते मग्न होते. त्याचे अक्षर चांगले म्हणून लिखाणाचे काम तिने नेहेमीप्रमाणे त्याच्यावर ढकलले होते. ३-४ कॉफीच्या फेऱ्यांनंतर, तब्बल २-२.५ तासांनी ते विसावले. काम मनासारखे झाले म्हणून दोघेही खुश होते.

थोडावेळ गप्पा मारून घरी जावे असे त्यांनी ठरवले. इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. पावसाळ्याचे दिवस असूनही बाहेर सुर्य तळपत होता. हळूहळू गप्पा रंगात आल्या - कॉलेजच्या दिवसांच्या आठवणी, गमती-जमती, सध्याची धकाधकीची दिनचर्या...

लख्ख ऊन होतं आणि पावसाला सुरूवात झाली होती. ऊन्हामुळे पाण्याचे थेंब चकाकत होते. मोठे मनोरम दृश्य होते. तिने त्याचे लक्ष बाहेरच्या पावसाकडे वेधले. दोघेही गप्पा विसरून पावसात हरवले. काही क्षण असेच गेले. अचानक त्याचे लक्ष काचेवर पडलेल्या तिच्या हसऱ्या प्रतिबिंबाकडे गेले. त्याला प्रथमच तिचे सौंदर्य जाणवले. तो स्वतःशीच हसला. दोघांनी एकमेकाकडे पाहिले - डोळे मनातलं सर्व काही बोलून गेले. पाऊस जितका अचानक आला तितकाच अचानक थांबला....दोघांच्याही नकळत, अनाहूतपणे, त्यांच्या आयुष्याच्या एका नवीन सोनेरी पर्वाची सुरूवात झाली होती.

पावसाच्या गोष्टी - ॥२॥

काळे ढग दाटू लागले आणि आभाळ गडगडू लागलं. उष्म्याने आसुसलेले जीव आपापल्या फ्लॅटच्या बाल्कनीत जमू लागले. एखादीतरी जोरदार सर यावी आणि वातावरण थोडे थंड व्हावे असे प्रत्येकालाच मनोमन वाटत होते. काळ्या ढगांची गर्दी वाढली, तशी, लहान-मोठ्यांच्या मनातली ही इच्छा पूर्ण होणार अशी खात्री वाटू लागली.

रविवार असल्यामुळे बरीचशी लोकं घरीच होती. काही मंडळी आकाशाकडे आशाळभूत नजरेने बघत होती, तर काही गप्पांमधे रमली होती. एरवी आपापल्या फ्लॅटच्या बंदिस्त विश्वात मग्न असलेली माणसं, येणाऱ्या पावसाच्या निमित्ताने का होईना, एकमेकांशी संवाद साधत होती. वातावरणात एक वेगळाच उत्साह होता.

एखाद्या स्वागत समारंभात गुलाब पाण्याचा शिडकावा व्हावा तसे काही थेंब पडले. हळूच ह्या थेंबांचा जोर वाढला, मधेच थोडावेळ थांबला आणि अचानक परत सुरू झाला; जणू ढगाआड लपलेला एखादा खट्याळ मुलगा पाण्याच्या पिचकारीने जमिनीवरच्या मंडळींना चिडवत होता. मनातला उल्हास शब्दावाटे बाहेर पडू लागला.

हे असे तुरळक थेंब येताच, खालच्या आवारात पोरांची गर्दी जमली. मुलं त्यांच्या-त्यांच्या दंगा-मस्तीत रममाण झाली. बाललीला बघण्यात मोठेही दंग झाले. अचानक पाऊस यायला लागला - रप-रप-रप-रप. मुलांचा किलबिलाट आणखीनच वाढला.

"अरे, पावसात भिजू नकोस. चल ये वरती...."
"सर्दी-खोकला झाला की मग बघ हं..."
"भिजलीस-तब्येत बिघडली आणि शाळेचा पहिला दिवस बुडाला की बघ तूच काय ते सांग तुझ्या बाईंना...."


साधारण असे काहीसे संवाद प्रत्येक बाल्कनीतून ऐकू येत होते. पण पोरच ती, ती कसली जुमानताहेत!

"मम्मा, प्लीज प्लीज, प्लीSज," रिया सोनालीभोवती नाचत होती. "मला पन पावशात खेलायचय!".....फक्त १० minutes प्लीSज". अखेर सोनाली विरघळली. "Thaaankss!" सोलालीला पटकन मिठी मारून रियाने खालती धूम ठोकली. "लवकर ये हं," सोनालीचे शब्द रियापर्यंत पोचलेच नाहीत. तब्बल पाऊण तासानंतर पाऊस थांबला. स्वच्छ कोरडे कपडे घालून रिया पुन्हा खाली आली. तिचा आणि तिच्या मैत्रिणींचा, पाण्यात होड्या सोडायचा नवीन खेळ सुरू झाला होता. सोनाली बाल्कनीतून लेकीला कौतुकाने न्याहाळत होती.

"मSम्माS, हे बघ, माझी बोSट," रिया हात उंचावून, सोनालीला, तिने बनवलेली होडी दाखवत होती. आईची शाबासकी मिळताच, रियाने होडी पाण्यात सोडली; उतार असल्यामुळे होडी पुढे जाऊ लागली. "मम्माS बोट जाते का गं, बाबांकडे? अमेरिकेला..."

प्रश्नाच्या उत्तराकडे रियाचे लक्षच नव्हते. पुढे जाणाऱ्या बोटीकडे बघण्यात, बाबांच्या भेटीच्या स्वप्नरंजनात रिया केव्हाच हरवली होती. दूरदेशी असलेल्या साहिलच्या, रियाच्या बाबांच्या आठवणीने मात्र सोनालीचे डोळे नकळत भरून आले.