Thursday, January 04, 2007

फिदा

यंदाच्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचा चारही दिवस पूर्णपणे आनंद लुटता आला. महोत्सवात गायन-वादन सादर करणारे सर्व कलाकार उत्कृष्टच असतात; तरीही काहींच्या महफिली इतरांपेक्षा अधिक रंगतात आणि आठवणींच्या सुवर्णकुपीत कायमचं घर करतात. ह्या वर्षीचा महोत्सव कुणामुळे लक्षात राहील, असा प्रश्न मला कोणी विचारला तर एकच नाव डोळ्यासमोर येतं - 'कौशिकी चक्रवर्ती'.

कार्यालयातून थेट कार्यक्रमाला जायचं, मध्यरात्रीनंतर कधीतरी घरी पोचायचं की परत सकाळी लवकर कामावर हजर; असा काहीसा कार्यक्रमाच्या दिवसात माझा परिपाठ होता. महोत्सवाचा दुसरा दिवस होता. शिवकुमार शर्मांच्या संतूरवादनानंतर, पोट, बाहेरच्या खाण्या-पिण्याच्या stallsकडे खुणावू लागलं. पटकन पोटोबा उरकावा आणि हात-पायही मोकळे करावेत ह्या हेतूने मी बाहेर पडले. नंतरचे गाणे कौशिकी चक्रवर्तींचे होते. कौशिकी, ह्या पं अजय चक्रवर्तींच्या कन्या व शिष्या, ह्या पलिकडे, मला त्यांच्याबद्द्ल काहीच माहिती नव्हती......

सवाई गंधर्वला येणारे बहुतांश रसिकगण खवैयेही असावेत असे मला वाटते - जितकी गाण्याला तितकीच खाण्यालाही गर्दी असते! गर्दीतून वाट काढत कशी-बशी stallsपाशी पोचले. हवा तो पदार्थ मागवून मिळेपर्यंत आणि खाण्याकरता त्यातल्यात्यात निवांत कोपरा शोधण्यात थोडासा वेळ गेलाच. गर्दी असूनही ओळखीचे कोणीनाकोणीतरी भेटत गेले आणि नाही म्हटलं तरी च्याऊ-म्याऊचा आमचा फेरफटका लांबला. तेवढ्यात स्वरमंडपातून बहारदार ताना ऐकू येऊ लागल्या आणि त्याला मिळणारी रसिकांची मनमोकळी दादही. आता मात्र मला बाहेर थांबल्याचे थोडेसे अपराधीच वाटू लागले.

लगबगीने स्वरमंडपात पोचले तेव्हा राग रागेश्रीमधील 'मेरो मन हरवा...' ही बंदिश रंगात आली होती. गोल-गुबगुबीत चेहेरा, बंगप्रांतीय मुलींप्रमाणे नितळ-उजळ कांती, काजळ घातलेले विलक्षण बोलके डोळे आणि अतिशय लोभसवाणे स्मितहास्य - कौशिकींनी माझ्या ह्रदयात तत्काळ जागा मिळवली.

राग रागेश्रीनंतर कौशिकींनी एक सुरेख ठुमरी सादर केली - 'रंगी सारी गुलाबी चुनरिया रे.." कुठलीही कला सादर करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलाकाराची तयारी. परंतू जोपर्यंत त्या सादरीकरणात भाव उतरत नाही तोपर्यंत, ते सादरीकरण अपूर्णच, असे मला वाटते. शास्त्रीय संगीत, सामान्य माणसाला रुचेल अशा पद्ध्तीने सादर केले जात नाही असा बऱ्याच जणांचा आरोप असतो आणि तो मला काही अंशी पटतो देखील. कौशिकींचे गाणे मात्र थेट रसिकांच्या ह्रदयापर्यंत पोचत होते एवढे नक्की! त्यांचा आवाज, गाण्यात उतरणारा भाव आणि नजाकत, रसिकांवर अशी मोहिनी घालत होती की नकळत प्रेक्षकातील प्रत्येकाच्या मुखातून 'वाSSहSवा'ची बरसात होत होती.

कौशिकी जेव्हा गाणं संपवून उठल्या तेव्हा प्रेक्षकांनी त्यांना उभं राहून, टाळ्यांच्या गजरात निरोप दिला.

आज पुन्हा कौशिकींच्या स्वरगंगेत न्हायचा योग आला. बिहाग, मालकंस आणि त्यांनी पेश केलेल्या इतर नजराण्यांच्या धुंदीतच वावरत्ये मी!

5 comments:

Traveler said...

chhan lihile aahe!Bharatiya sangit paramparet changla ganarya barobar janakaralahi mahatva aahe. hope to read marathi posts more often!

Akira said...

Thank you Traveler. Prayatna kareen..

Anand Ghare said...

नमस्कार. सवाई गंधर्व महोत्सवाचे मोजक्या शब्दात छान वर्णन केले आहे. या वर्षी मी सुद्धा तिथे गेलो होतो. त्याचा वृत्तांत थोडा पाल्हाळ लावून माझ्या याहू ३६० वर दिला आहे. शक्य झाल्यास वाचून आपला अभिप्राय कळवावा.

Anonymous said...

Hi akira, baryach divasanni lihiles. Nice post. Ajoon vistarane savai gandharva mahotsavabaddal vachayala aavaDel.

सहज said...

me sudha tithe hoto...aani baai anpekshit pane paus padava ... aani kahi kshanatach chimb bhijvun java...tashya gaylyat

chan lihale aahes !!